▪️चिचपल्ली वन परिक्षेत्रातील वास्तव उघड
चंद्रपूर | रुपेश निमसरकार
पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी वृक्ष कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात आणि ऑक्सिजन देतात. त्यामुळे हवेची गुणवत्ता सुधारते. वृक्ष हवामान वाढवतात आणि हवामान लवचिकता प्रदान करतात. वृक्ष वादळी पाण्याचा प्रवाह कमी करतात, ज्यामुळे पुराचा धोका कमी होतो. वृक्ष जमिनीचे आरोग्य वाढवतात. वृक्ष अनेक प्राण्यांना अन्न, निवारा आणि संरक्षण देतात. वृक्ष श्वास घेण्यासाठी आवश्यक असलेला ऑक्सिजन देतात. वृक्ष लागवडामुळे समृद्धी वाढते आणि जीवनाची गुणवत्ता सुधारते. वृक्ष सौंदर्यदृष्ट्या आकर्षक असतात. त्यामुळे वनविभाग वृक्षारोपन कार्यक्रम घेत असतो. त्या वृक्षाची योग्य निगा व देखभाल वनविभाग करित असतो. यासाठी शासन लाखो रुपये निधी वनविभागाला देत असतो. यातूनच चिचपल्ली वनपरिक्षेत्रात लाखो वृक्षांची लागवड करण्यात आली परंतू वृक्षा़ची निगा व संगोपन करण्यात चिचपल्ली वनपरिक्षेत्र अधिकारी जाणिवपुर्वक दुर्लक्ष केल्याने अनेक वृक्ष करपून गेल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. व येथील अधिकारी शासनाच्या निधिला चुना लावत असल्याचे प्रत्यक्ष पाहणीवरुन उघड झाले आहे. त्यामुळे वनविभागाच्या पर्यावरण बचाव भुमिकेला येथील अधिकारी हरताळ फासत आहेत.
वृक्ष लागवड करुन त्याचे निट संगोपन केले तर नक्कीच लावलेली सगळीच रोपे जगू शकतात. अन्यथा लाखो रुपये खर्च करून लावलेली रोपे करपली जातात. असाच काहीसा प्रकार चिचपल्ली वनपरिक्षेत्रातील सुशी नियत परिक्षेत्रात घडला आहे. सन २०२३ मध्ये कक्ष क्रमांक ६७४ मधील १० हेक्टर क्षेत्रात ११ लाख वृक्षांचे रोपण करण्यात आले. या दोन वर्षाच्या काळात काही मोजकीच वृक्ष जिवंत असल्याचे पहावयास मिळाले. यावरुन कुंपणच शेत खात असल्याचा प्रकार दिसुन येते आहे.
भविष्यात प्राणवायूची आवश्यकता सर्वांनाच भासणार असुन वृक्षांचे संवर्धन करणे काळाची गरज आहे. हे ओळखुन वनविभागाबरोबरच सामाजिक संस्था, शाळा पुढाकार घेत असतात. शाळा व स्वंयसेवी संस्था वृक्ष जगविण्याचे आटोकाट प्रयत्न करतात. माञ जास्त जबाबदारी वनविभागाची असते. कारण त्यांना खड्डा खोदण्यापासुन तर वृक्ष संवर्धन करण्यासाठी रक्कम मिळत असते. तसेच एकुण पाच वर्ष देखभालीसाठी लाखो रुपये खर्च केली जातात. चिचपल्ली वनपरिक्षेत्रात सन २०२३ ला वानिकरणाचा भरगच्च कार्यक्रम अंतर्गत सुशी नियत क्षेत्रातील कक्ष क्रमांक ६७४ मध्ये एकुण १० हेक्टर वर ११ लाख वृक्षांची लागवड करण्यात आली. या वृक्ष लागवडीने परिसरातील गावातील लोकांना प्राणवायू मिळण्यास मदत होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता.मात्र या दोन वर्षांत बोटावर मोजण्याइतके वृक्ष दिसत आहे.दर वर्षाला देखभाल करण्यासाठी लाखो रुपये खर्च केल्या जात असते. एवढे असताना देखिल चिचपल्ली वनपरिक्षेत्र अधिकारी प्रियंका वेलमे, केळझरचे क्षेत्र सहाय्यक आर . एस.पडवे हे कानाडोळा करीत शासनाच्या लाखो रुपयाला चुना लावत असल्याची चर्चा परिसरात आहे. त्यामुळे या वृक्ष लागवड व संगोपन प्रकरणाची वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी केली तर मोठे घबाड समोर येऊन भ्रष्टाचार करणारे मोठे मासे गळाला लागू शकतात अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.
