▪️भारत कृष्ठरोगमुक्त अभियानात सहभागी करणार; संस्थेला ७५ कोटींच्या मदतीचे आश्वासन
चंद्रपूर | रुपेश निमसरकार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२७ पर्यंत भारताला कुष्ठरोगमुक्त करण्याचा संकल्प केला आहे. या अभियानात बाबा आमटे यांच्या संस्थेचा महत्त्वपूर्ण सहभाग आहे. त्यामुळे आनंदवनाच्या महारोगी सेवा समितीला सहभागी करून घेतले जाईल तसेच संस्थेला ७५ कोटींचे आर्थिक पाठबळही उपलब्ध करून दिले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
बाबा आमटे आणि साधनाताई आमटे यांनी स्थापन केलेल्या महारोगी सेवा समिती आनंदवनच्या ७५ व्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित कृतज्ञता सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी मंचावर राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके, उद्याोगमंत्री उदय सामंत, माजी राज्यपाल राम नाईक, आमदार किशोर जोरगेवार, करण देवतळे, महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ. विकास आमटे, डॉ. प्रकाश आमटे, डॉ. भारती आमटे, डॉ. मंदाकिनी आमटे आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, अतिशय कठीण काळात बाबा आमटेंनी महारोगी सेवा समितीच्या माध्यमातून समाजसेवेचे काम सुरू केले. समाजामध्ये ज्या कामाला मान्यता नव्हती, अशा स्थितीत बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांच्या सेवेचे व्रत हाती घेतले.
आज ७५ वर्षानंतर अनेक प्रतिष्ठित लोक या संस्थेची जुळले आहेत. या सर्व लोकांना आनंदवनातून आत्मिक समाधान मिळत असते. त्यामुळेच आनंदवन हे खऱ्या अर्थाने मानवतेचे मंदिर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा २०२७ पर्यंत कुष्ठरोगमुक्त भारत करण्याचा संकल्प आहे. या कामासाठी आनंदवनसारख्या संस्थांची मोलाची मदत घ्यावी लागणार आहे.
सेवाभाव उल्लेखनीय : उदय सामंत
आनंदवन येथे दिव्यांगांसाठी कौशल्य विकास केंद्र सुरू होत असून उद्याोगांशी समन्वय करून देण्यात आला आहे. या केंद्राच्या माध्यमातून दिव्यांगांना नोकरी मिळण्यास मदत होईल. आनंदवनसारखे किमान २ टक्के काम, इतर ठिकाणी करू शकलो, तर ती बाबा आमटे यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे उद्याोगमंत्री उदय सामंत म्हणाले.
बाबा आमटे यांच्या जीवनावर चित्रपट
बाबा आमटे यांच्या जीवनावर मराठी आणि इंग्रजी भाषेवर आधारित चित्रपटाचे ऑनलाइन पद्धतीने मुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
अनुदानात होणार वाढ
● आनंदवन येथे कौशल्य विकास केंद्र उभे राहत आहे. तसेच निवासी ५०० लोकांचे केंद्रसुद्धा येथे सुरू होणार आहे. २०१२ पासून आनंदवनला देण्यात येणाऱ्या अनुदानात आता बदल करण्यात येत असून प्रति रुग्ण २२०० ऐवजी आता ६ हजार रुपये तर पुनर्वसन अनुदान अंतर्गत प्रतिरुग्ण २ हजार वरून ६ हजार रुपये देण्यात येणार आहे.
● आनंदवनला १० कोटी रुपये ‘कॉर्पस फंड’ लगेच देण्यात येईल. उर्वरित ६५ कोटी रुपये कॉर्पस फंड देण्याकरिता नक्कीच प्रयत्न करू. आनंदवन ही समाजाची संस्था आहे. सकारात्मक संस्थेच्या मागे उभे राहणे ही शासनाची जबाबदारी आहे, असेही फडणवीस म्हणाले.
अनेक अडचणींचा सामना आनंदवनला करावा लागत असला तरी विचलित न होता आनंदवनचे काम निरंतर सुरू आहे. विविध क्षेत्रातील लोक या संस्थेसोबत जुळले आहेत. यात कला, संगीत, फिल्म, उद्याोग आदींचा समावेश आहे. मूलभूत सेवेचा उत्कृष्ट नमुना आनंदवनात आहे – देवेंद्र फडणवीस, मुख्यंमत्री
