▪️छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवर चकमक
▪️दोन जवान शहीद, दोघे गंभीर जखमी
गडचिरोली | रुपेश निमसरकार
छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवर सुरक्षा जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत ११ महिलांसह ३१ नक्षलवादी ठार, तर दोन जवान शहीद झाले आहेत. दोन जवान जखमी असल्याचीही माहिती आहे. गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात ही चकमक झाली. परिसरात अद्याप शोध मोहीम सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बिजापूर जिल्ह्यातील इंद्रावती राष्ट्रीय उद्यान परिसराला लागून असलेल्या तोडका जंगल परिसरात नक्षलवाद्यांचे दोन दलम लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा जवानांनी त्या परिसरात नक्षलविरोधी मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेत तब्बल ६५० जवान सहभागी झाल्याची माहिती छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांनी दिली. कारवाईदरम्यान दडून बसलेल्या नक्षलवाद्यांनी सुरक्षारक्षकांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. जवानांनी दिलेल्या प्रत्युत्तरात ३१ नक्षलवादी ठार झाले. चकमकीत दोन जवान शहीद झाले असून जखमी झालेल्या जवानांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
गेल्या काही वर्षांपासून सुरक्षा जवानांनी केलेल्या आक्रमक कारवायांमुळे नक्षलवादी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतरित होत आहेत. तसेच दोन राज्यांच्या सीमांवरील अंतर्गत भागात बैठकाही घेत आहेत. गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी बिजापूर जिल्ह्यात रविवारी कारवाई केली. चकमकस्थळ गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेपासून जवळ आहे. ठार झालेल्या सर्व नक्षलवाद्यांचे मृतदेह जवानांनी ताब्यात घेतले आहेत. तीन जिल्ह्यांतील सीआरपीएफ, डीआरजी आणि एसटीएफच्या जवानांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. ठार झालेल्या नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे व दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी मार्च २०२६ पर्यंत नक्षलवाद संपवण्याची घोषणा केल्यानंतर छत्तीसगड-गडचिरोलीत नक्षलवाद्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात कारवाया सुरू आहे.
नक्षलमुक्त भारतचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने सुरक्षारक्षकांना छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये मोठे यश मिळाले आहे. ही कारवाई करताना शहीद झालेल्या जवानांचा देश सदा ऋणी राहील. शहीद जवानांच्या कुटुंबीयांप्रति मी सहवेदना व्यक्त करतो. त्याबरोबरच ३१ मार्च २०२६च्या आधी देशातून नक्षलवाद मुळापासून नष्ट करण्याच्या संकल्पाची पुनरावृत्ती करतो – अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री
